मी सदाशिवपेठी

माझा जन्म सदाशिव पेठेतील. पण सदाशिव पेठेत राहायला येण्यासाठी १७ वर्षे उलटावी लागली. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे सगळे शालेय शिक्षण अखिल महाराष्ट्रात झाले आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी मात्र पुणे गाठले. कधी न राहिल्यामुळे असेल पण मुंबईत राहून सुद्धा मला पुण्याबद्दल एक सुप्त आकर्षण होते. पुणे विद्यार्थी गृहाच्या सदाचार वसती गृहात स्वस्त दारात राहण्या जेवणाची सोय झाली आणि हे वसतीगृह सदाशिव पेठेत असल्याने माझा मुक्काम सदाशिव पेठेत पडला. त्यामुळे पहिला पत्ता १७८६ सदाशिव पेठ असा झाला. सायकलींचा गजबजाट असलेल ते पुणे शहर मला एकदम भावल.कॉलेज ला जायला सायकल मिळाली होती. सगळ शहर सायकलच्या आवाक्यात होत. आप्तेष्ट पण खूप . त्यांचा भावनिक आधार इथलं एकेपण जाणवू देत नव्हत. कॉलेज मध्ये बहुतेक विद्यार्थी  प्राध्यापक  हे सदाशिव-नारायण व सदाशिव पेठेत राहणारे होते. प्राचार्य जरा पलीकडे म्हणजे मोडेल कॉलोनी मध्ये राहत. पण काही जण जरा लांबून म्हणजे सोमवार पेठ, भवानी पेठ इथून येत. एक कृष्णकुमार अगरवाल -पुढे त्याने आडनाव गोयल लावले तो खडकी हून येत असे. पण असे अपवादात्मकच . कॉलेज बरोबर विद्यार्थी परिषदेचा मित्रपरिवार मिळाला. त्यावेळी मनात या सदाशिव पेठेत आपल्याला स्थायिक होता येईल का असे मनात विचार येत. पण ते लगेच मी परतवून लावत असे. आधी शिक्षणानंतर पुण्यात नोकरी मिळेल का हीच शंका होती. कारण बी कॉम नंतर साधारणपणे बँकेत नोकर्या मिळत असत आणि पोस्टिंग बहुतेकवेळा बाहेरगावी होत असे.
पण शिक्षण सुरु असतानाच टेल्को सारख्या कंपनीत प्रशिक्षणासाठी निवड झाली व एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर पदवीच्या आधी नोकरी लागली  आणि त्यामुळे पुण्यात राहणार हे ठरले. नोकरी लागल्यानंतर वसतिगृहातून बाडबिस्तरा आवरून सदाशिव पेठेत उपाशी विठोबाच्या वाड्यात कॉट बेसिस वर जागा घेवून पत्ता बदलला -१३२७ सदाशिव पेठ.
या सदाशिव पेठेने खूप काही दिले. पहिल्यांदा पु ल इथेच दिसले. वसंत व्याख्यान माला, पुरुषोत्तम करंडक स्पर्धा, कलोपासक ची प्रयोग ही चळवळ, सांस्कृतिक कार्यक्रमांचा अक्षरश: खजिना, पाठ्यपुस्तकात ज्यांचा धडा होता ते दि बा मोकाशी व अनेक साहित्यिक , संपादक , पत्रकार अशा कितीतरी ओळखी.
वडिलांची बदली पुण्यात झाली व येरवडा येथे सरकारी घर राहायला मिळाले.व मुक्काम पुणे ६ मध्ये हलवला. तिथे २-३ वर्षे कशी बशी काढली पण पुणे ३० चा ओढा स्वस्थ बसू देत नव्हता . त्या वेळी गावात जुने वाडे पाडून ओनरशिप घरे करायची सुरुवात झाली होती. मग नियोजन करून आम्ही ओंकारेश्वर मंदिराजवळ घर घेतले व शनिवार पेठेत म्हणजे पुणे ३० मध्ये आलो आणि २० वर्षे टिकलो. नंतर सदाशिव पेठेला जवळ म्हणून नारायण पेठेत आलो तिथे येवून पण २० वर्षे उलटून गेली.
या सगळ्या कालौघात शहर पूर्ण बदलून गेले. किंबहुना पूर्वीचे ते पुणे हरवलेच . पण हे अपरिहार्य होतेच. पण मनात समाधान आहे आपण सदाशिव पेठेत नाही तरी पेठेच्या अगदी जवळ आहोत. आणि ही जाणीव जागृत ठेवण्यासाठी मी मग एका अस्सल सदाशिव पेठी पुणेकराला भेटून येतो. ते म्हणजे माझे काका, त्यांनी वयाची नव्वदी पार केली. बरेच बदल स्वीकारले पण सदाशिवपेठी पुणेरीपण जपले. त्यांना भेटले की मनातील सुप्त सदाशिव  पेठी सुखावतो.

अनिल जोशी 
(११.०१.२०२०)

कृपया आपली प्रतिक्रिया नावानिशी द्यावी)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती