भेटीलागी जीवा

तशी कुणाशी भेट होणे ही आनंदाची गोष्ट असते. प्रियजनांच्या भेटीची आपल्याला आस लागते तर नको असलेल्या व्यक्तींशी भेट होऊ नये अशी आपण इच्छा करतो. अर्थात ते तसे होतेच असे नाही. तशाही सगळ्या गोष्टी आपणाला हव्या तशा घडतातच असे नाही. पण काही भेटा आपल्या आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवल्या जातात. त्यातून काही मान्यवरांच्या भेटी झाल्या तर आपण त्याला भेटीचा योग्य म्हणतो.
सुदैवाने बऱ्याच मान्यवरांना भेटायचा योग मला आला. काही संस्मरणीय ठरल्या तर काही खास अशा नव्हत्या.
कलासागर दिवाळी अंकाच्या निमित्ताने पु ल देशपांडे, गोविंद तळवलकर, माधव गडकरी, एस के कुलकर्णी, श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर,दि बा मोकाशी,वीणा देव , दिलीप पुरुषोत्तम चित्रे,वि स वाळिंबे, शांता शेळके, बाळासाहेब मंगेशकर अशा मान्यवरांना भेटून त्यांच्याशी बोलायचा योग आला.तर किर्लोस्कर मासिकाचे काम असताना मुलाखत घेण्याच्या निमित्ताने पं.जसराज यांच्या भेटीचा योग आला.
पूर्वी कधीतरी आसपास मोठे कलाकार असत पण त्याच्याशी जाऊन बोलण्याचे धाडस होत नसे. कॉलेज मध्ये साहित्य चर्चा मंडळाचा सचिव झल्यावर आनंद यादव, विद्याधर पुंडलिक, शंकर पाटील अशा लेखकांना भेटायची संधी मिळाली. द मा मिरासदार हे तर आमचे सर होते आणि साहित्य चर्चा मंडळाचे प्रमुख त्यांचा बराच सहवास लाभला तर शरच्चंद्र चिरमुले हे प्राचार्य व कथा लेखक त्यामुळे त्यांचे साहित्यविषयक विचार नेहेमी ऐकायला मिळत असत.
एका कार्यक्रमाच्या वेळी व पु काळे यांना पण भेटलो होतो. मित्र दिवाकर बुरसे याच्या मुले मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर यांना पण भेटता आले होते. सवाई गंधर्व संमेलनात भोवताली फिरताना रघुनंदन पणशीकर, अरविंद थत्ते यांना भेटलो होतो. पण ग्रीन रूम मध्ये अजय पोहनकर बसले होते आणि त्यांचे लगेच गाणे होणार होते त्यांना डिस्टर्ब् करावेसे नाही वाटले. आणि अशावेळी आपल्यापाशी काही विषय , मुद्दा असेल , प्रयोजन असेल तर त्या भेटण्याचा अर्थ असतो.
हा विषय मी पंडित जसराज यांच्याकडे काढला होता. मुलाखत झाल्यानंतर मी त्यांना म्हटले की बरेच दिवस तुम्हाला भेटायची इच्छा होती पण भेटून काय बोलायचे हा प्रश्न होता. त्यांना भेटून काय  म्हणायचे तुमचे गाणे आवडते तर ते म्हणतील मग कॅसेट ,रेकॉर्ड ऐका. यावर ते म्हणाले हे अगदी बरोबर आहे . मग त्यांनी त्यांचा किस्सा सांगितला. त्यांना लता मंगेशकर यांना भेटायचे होते म्हणून ते बाळासाहेब मंगेशकरांसोबत त्यांच्या रेकॉर्डिंग च्या ठिकाणी गेले.पण काही बोलू शकले नाहीत. त्यांना बाळासाहेबांनी आठवण करून दिल्यावर ते म्हणाले - मै क्या खाक बात करुंगा. क्या कहू तुम अच्छी गाती हो?
अशी अवस्था होते जेव्हा अशा व्यक्ती समोर येतात. बालगंधर्व चित्रपट पाहिल्यानंतर मला जाणवलं की हा चित्रपट सुबोध भावे यांच्या अभिनयाने गाजलाच असता . पण बालगंधर्व म्हणजे त्यांची गायकी आणि लडिवाळ गोड गाणे. या गाण्याची नवीन पिढीला ओळख झाली ती गायक आनंद भाटे यांच्यामुळे. आणि हे मला प्रत्यक्ष आनंद भाटे यांना सांगायची संधी मिळाली.
पण एक भेट होता होता माझ्या कर्मदरिद्रीपणा मुळे राहिली. अवघा रंग एक झाला हे नाटक पाहायला गेलो असता त्यात माझा मित्र गौतम मुर्डेश्वर काम करत होता म्हणून मध्यंतरात त्याला भेटायला गेलो तेव्हा तो व त्याच्या शेजारी प्रसाद सावकार उभे होते. माझे बोलणे सुरु झाल्यावर ते बाजूला निघून गेले . भेटून आल्यावर वाटलं साक्षात प्रसाद सावकार यांच्याशी भेटायची व बोलायची आलेली संधी आपण घालवली. लहानपणी त्यांचं जय गंगे, नारायणा रमा रमणा या गाण्यांनी आम्हाला नाट्यसंगीताची ओळख झाली होती आणि पुढे शास्त्रीय संगीताची गुहा सापडली हे त्यांना सांगता आले असते. पण ती संधी गेली ती गेलीच.
म्हणून संतांनी जरी म्हटले आहे की भेटीलागी जीवा यात त्यांना भेट परमेश्वराशी हवी आहे. पण आपण सजग नसू तर मात्र भेट घडेलच असे नाही..

अनिल जोशी 
०८.०१.२०१२०.
(कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी)

Comments

  1. काही वेळा मी फक्त तुमचा चाहता आहे असे म्हणून नमस्कार करुन आलो आहे. पण बहुतेकांना रसिकांना भेटायला आवडते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती