विद्यार्थ्यांमध्ये उद्रेक -सत्ताधार्यांना धडकी

नागरिकत्व सुधार कायद्याच्या विरोधात जामिया विद्यापीठात आंदोलन झाले व त्याला हिंसक वळण लागले. त्या निमित्ताने एकदम राजकिय वातावरण ढवळून निघाले . सोनिया गांधी यांनी मोदी सरकारचा अंत जवळ आल्याचे भाकीत केले तर सरकारच्या या कृतीचे वर्णन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बाग घटनेशी केले. या वानगी दाखल दोन ठळक प्रतिक्रिया. या आंदोलनामुळे अनेक विरोधी राजकीय नेते उत्तेजित झाले याचे कारण त्यांना असलेले विद्यार्थी शक्तीचे भान. जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये उद्रेक झाला तेव्हा त्यांनी सत्ता पालटून दाखवली आहे.
१९७४-७५ मध्ये विद्यार्थ्यांनी नव निर्माण आंदोलन केलं व गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
आणि मग जनता मोर्चा च्या नावाने निवडणूक जिंकली. गुजरातच्या पासून प्रेरणा घेऊन बिहार मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले. त्याचे नेतृत्व जयप्रकाश नारायण यांनी स्वीकारले व ते सर्वपक्षीय देशव्यापी आंदोलन झाले. नंतर सत्तेसाठी आणीबाणी लावली गेली पण नंतरच्या निवडणुकीत देशात राष्ट्रीय स्तरावर प्रथमच काँग्रेस पराभूत झाली. पुढे आसाम मध्ये आसू या विद्यार्थी संघटनेने आसाम गणसंग्राम परिषदेच्या माध्यमातून निवडणूक लढवून जिंकली होती.
ही शक्ती काय करू शकते हे पाहायचे झाल्यास थोडे इतिहासात डोकावून पाहायला हवे. १९७३-७४ चा काळ होता. त्या वेळी देशभर विद्यार्थी आंदोलने सुरु होती, विशेषतः: उत्तरेत ती आक्रमक व हिंसक बनत होती. नक्की आठवत नाही पण बहुतेक लखनौ विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आग लावली होती. त्या वेळी मी विद्यार्थी चळवळीत सक्रिय असल्याने याची माहिती मिळत होती. आम्ही बडोदा येथे अभ्यासवर्गाला गेलो असता अनेक अन्य प्रदेशातील विद्यार्थी नेत्यांशी चर्चा झाली. आणि त्या वेळी सोबत साप्ताहिकात युवकांचा स्तंभ लिहिणारे प्रकाश जावडेकर (सध्याचे केंद्रीय मंत्री) यांनी त्या ठिकाणी जायचे ठरवले. त्यांनी दिल्ली, बनारस, लखनौ,अशा काही शहरांमध्ये जाऊन विद्यार्थी नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्या व सोबत मध्ये एक लेखमाला लिहिली (ज्याचा लेखनिक मी होतो त्यामुंळे लेखांमध्ये नसलेल्या अनेक गोष्टी बोलता बोलता समजल्या.)
याचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे वातावरण स्फोटक झाले होते . बडोद्याला गेलो असताना तेथील चळवळ
अधिक जहाल असल्याचे पहिले होते. त्या मानाने पुण्यात आणि महाराष्ट्रात ही चळवळ शांत व विधायक होती.
उदाहरण द्यायचे तर त्या वेळी पुण्यात बहुतेक विद्यार्थी सायकल वापरत असत व पोलिसांनी फतवा काढला रात्री रात्री सायकलला दिवा लावणे सक्तीचे आहे . हे फारच गैरसोयीचे व खर्चिक होते. मग एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो व आमचे म्हणणे सांगितले. त्यांनी सूर्यास्तानंतर वाहनांना दिवा असणे कायद्याने बंधन कारक आहे असे सांगितले व ते तुमच्या सुरक्षिततेच्या साठी आवश्यक आहे असे सांगितले पण आमच्या समाधानासाठी सांगितले अर्धा तास आम्ही सूट देऊ. तसेच दिल्ली विद्यापीठातील एका विद्यार्थी नेत्यावर तेथील कुलगुरूंनी कारवाई केली असता असेच शिष्टमंडळ घेऊन पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे गेलो मग त्यांनी आमच्या भावना दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंना एक पत्र लिहून कळवल्या.
वंदे मातरम म्हणण्यावरून जेव्हा वातावरण गरम झाले होते तेव्हा आम्ही एक सर्वपक्षीय सभा घेतली होती तर नवीन विद्यापीठ कायदा अस्तित्वात येण्यासाठी सरकारने ज्या दिवशी विधेयक आणले त्या दिवशी अलका टॉकीज चौकात दिवसभर लाक्षणिक उपोषण केले होते. पुणे विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवाला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना न बोलावता एखाद्या शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तीला बोलवावे अशी मागणी लावून धरली होती. त्या वेळी ज्या सिनेट बैठकीत या निर्णयावर शिक्का मोर्तब होणार होते तिथे जाऊन दंगा केला होता. तेव्हा बैठकीत असलेले एस एम जोशी बाहे येऊन असा दंगा करू नका असे आम्हाला रागावून सांगू लागले तेव्हा आम्ही तुमच्याशी नाही तर कुलगुरूंशी बोलू असे सांगितले तेव्हा कुलगुरू रँग्लर महाजनी म्हणाले एस एम माझे प्रतिनिघी आहेत. मग थोडा दंगा , घोषणाबाजी करून आम्ही परत आलो. नंतर या संबंधी जण जागरण करण्यासाठी जेव्हा एस पी कॉलेज वर सभा घेतली तेव्हा ती सभा उधळून लावण्यात आली आणि मग हे आंदोलन विपरीत दिशेला जाऊ नये म्हणून स्थगित केले.
नंतर एकदा शासनाला मागण्यांचे पत्र देण्याच्या निमित्ताने जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करून अनेक कार्यकर्त्यांनी अटक करून घेतली. हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे इथली चळवळ पण आक्रमक होऊन रस्त्यावर येऊ लागली होती.
 या आंदोलनातून अनेक नवीन नेते निर्माण झाले. अगदी मुलायम लालू पासून जेटली , जावडेकर, मुंडे व अनेक.विद्यार्थी नेते प्रफुल्ल महंत एकदा नव्हे तर दोन वेळा मुख्यमंत्री झाली तर सध्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल पण याच चळवळीतून पुढे आले आहेत.
साहजिकच हा इतिहास पहिला तर विद्यार्थी चळवळीचे सामर्थ्य लक्षात घेता ही चळवळ सध्या सामर्थ्यवान
असलेल्या मोदी यांना हटवू शकेल अशी आशा शक्तीहीन विरोधकांना वाटू लागली आहे.

अनिल जोशी
०५.०१.२०२०
(कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी.)

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती