राग मधुवंती

काल बसमधून घरी जाताना पंडित जसराज यांचा मधुवंती ऐकत होतो. थेट मैफलीमधील ध्वनिमुद्रण असल्याने त्यांनी तो छान रंगवला. त्यातील विरहार्त भावना मन व्याकुळ करीत होती पण त्यातील विलक्षण गोडी पण मजा आणत  होती . अर्थात हा राग फार गायला जात नाही आणि मधुवंती म्हटलं की सुमन कल्याणपूर यांचं गाणं आठवत .
मधुवंतीच्या सुरासुरातून आळविते मी नाम
एकदा दर्शन दे घनश्याम
नयनी माझ्या गोकुळ वसले
यमुनेचे जळ गाली झरले
राधेपरी मी सर्व वाहिले सुख शांतीचे धाम
वसंतातले सरले कूजन
तुझ्याविना हे उदास जीवन
शोधीत तुजला फिरते वणवण, नाही जीवा विश्राम
दासी मीरा ये दाराशी
घे गिरिधारी तव हृदयाशी
या पायाशी मथुरा -काशी, तीर्थापरी हे नाम
एकदा दर्शन दे घनश्याम

मधुवंती रागावर आधारित काही गाणी
निरोप कसला माझा घेता
झन झनन छेडिल्या तारा
प्रेम सेवा शरण
बहरला पारिजात दारी
मधुवंतीच्या सुरासुरातूनी
स्वप्नात रंगले मी
सुमन कल्याणपूर यांचे हे अवीट गोडीचे भावगीत. त्यांचा गोड आवाज आणि जसे शब्द हेत त्याप्रमाणे सम्पूर्ण गाण्यात मधुवंतीचे मधाळ सूर सर्वत्र झिरपत असतात
मधुवंती हा तोडी थाटाचा राग आहे .या मध्ये गांधार कोमल तर मध्यम तीव्र आहे. पूर्वी हा अंबिका या नावाने ओळखला जात असे.
हिन्दुस्तनी राग मधुवंती, थाट: तोडी या राग- मध्ये गांधार 'कोमल तर मध्यम तीव्रअसतो. याचे चलन मुल्तानी,भीमपलासी प्रमाणे आहे. जाति : ओडव.
आरोह : नि (मंद्र) सा गा म प नि सां। अवरोह : सा नि धा प म ग रे सा। वादी -संवादी : प -सा गायन समय : दिवसाचा तीसरा प्रहर प्रकृति : कोमल, रस : विरह आणि करुण
पकड़ : ग (कोमल) म (तीव्र) प धा म प। आलाप :नि (मंद्र) सा गा म प, गा मा प ग नि धा प, म ग रे सा।
याच्या जवळचा राग म्हणजे मुलतानी. मुलतानी मधील रिषभ आणि धैवत शुद्ध लावले की मधुवंती होतो. अर्थात हा राग शृंगार रसाने परिपूर्ण आहे.

या रागाची निर्मिती जयवंतसिग वाघेला यांनी १९३०च्या सुमारास केली .मुलतानी मधील कोमल धैवत आणि कोमल रिषभ घेवून  हा राग च्या जागी शुद्ध रिषभ आणि शुद्ध धैवत वापरून हा अंबिका राग तयार झाला . सन १९६० मध्ये याचे नामकरण मधुवंती असे करण्यात आले.
जयवंत सिंग वाघेला यांने  रचलेली मूळ चीज या प्रमाणे आहे.

झूठी प्रीत कीनी तूने मोसो
मोरा दुखवा जानत नाही ।
हाथ पकर कर गुनीदास को
चरन परी तू प्रभूके आगे
स्वानंदी मोरी आस गवायी
तोहे प्रभू को डर नाही ॥
(प्रयाग संगीत समितीच्या ८व्या वर्षाच्या अभ्यासक्रमात मधुवंतीचा समावेश आहे..)
सवाई गंधर्व महोत्सव आता संध्याकाळी सुरु होत असल्याने हा राग पण सादर केला जातो.
६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला (सन २०१८ )काल पासुन मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ संकुलाच्या
मैदानावर सुरूवात झाली. तर आज दुसर्‍या दिवशी बनारस घराण्याच्या नामवंत गायिका रिता देव यांच्या सुरेल
गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग मधुवंती ने केली. त्यांनी आपल्या गायकीतून
‘मधुवंती’रागाचे सौंदर्य उलगडून दाखविले. विलंबित ख्याल सादर करून त्यांनी श्रोत्यांची मने देखील जिंकली. तबलजी
आणि त्यांच्या जुगलबंदीला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कामत (तबला), मिलिंद
कुलकर्णी(हार्मोनियम), अनुजा भावे, वैशाली कुबेर(तानपुरा) यांनी साथसंगत केली.
हा मधुवंतीचा अनुभव फक्त श्रवणातून संपूर्ण शरीरभर नव्हे तर संपूर्ण व्यक्तिमत्व व्यापून टाकतो. ही स्वरानुभूती
आपल्याला वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते. नेहेमीचा रस्ता, ट्राफिक , अडथळे काहीच जाणवत नाही. संध्याकाळ
कलत चाललेली प्रकाश अंधुक व्हायला लागल्याने जाणवत.
मध्य लयीतील तानबाजी सुरु झाल्यानंतर लक्षात येत की आता दिशा अंधारून आल्या आहेत. त्या ताना कातरवेळ
चिरत जातात. मग द्रुत मधील बढत मधुवंतीला एका वेगळ्या उंचीवर नेते. सुरुवातीच्या आलापी मधील कातरता
आणि हुरहूर नष्ट होऊन फुललेला शृंगार रस जाणवायला लागतो. एकदम समेवर येऊन पंडितजी थांबतात. आता
कानावर पडणारे सूर थांबले असले तरी मनात मात्र ते सूर गुंजन करतच राहतात. हा मधुवंती आठवणीत खोल
कुठेतरी घर करून बसतो. हा बरेच दिवस मुक्काम ठोकणारा आवडता पाहुणा आहे. त्याचा व्यवस्थित पाहुणचार
व्हायलाच हवा.

अनिल जोशी 
२०.०२.२०२०

कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments

  1. आपण मधुवंती हा राग यशवंतबुवा जोशी यांचा ऐकला होता, १९ १२ १९९८ रोजी, छोटा गंधर्व यांच्या प्रथम पुण्यतिथीला....त्या वेळी मधुवंती दांडेकर मैफलीत समोरच बसलेल्या होत्या....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे