अधांतरी

आज जयवंत  दळवी यांच्या अधांतरी या कादंबरीची प्रकर्षाने आठवण झाली. याच नाटकावर त्यांचे सावित्री हे नाटक पण रंगमंचावर आले होते.
Adhantari
तशा त्यांच्या साहित्यात अतृप्त ( विशेषत: सेक्स बाबतीत ) बर्याच व्यक्तीरेखा येतात. अगदी गुंतता ह्रदय हे पासून अनेक कलाकृतींमध्ये कधी ठळक पणे तर कधी अंधुक उल्लेखाने येतात. पण आज ज्या दोन व्यक्ती रेखा आठवतात त्यात अथांग मधील सुमी (या कादंबरीवर महासागर हे नाटक आले होते) व अधांतरी मधील सावू. या दोन्ही नायिकांमध्ये साम्य असे की या स्वत:चा संसार व्यवस्थित चालू असताना परक्या पुरुषाच्या मोहात आपले आयुष्य उधळून देतात. सुमीचा नवरा उद्योजक आहे तरी एका पार्टी मध्ये रेहमान नावाच्या पुरुषाचे तिला पिसे लागते. तर सावूचा म्हणजे सावित्रीचा नवरा शाम हा प्राध्यापक आहे तर ती केटी नामक पुरुषासाठी आपला संसार उधळून लावते. तेव्हा तिची आत्या जाताजाता सावूच्या आईचा संदर्भ देते. तिची आई तबलजी बरोबर संसार सोडून पळून गेली होती. त्यावर ती म्हणते की शेवटी वळणाचे पाणी वळणाला गेले. एखादी संसारी स्त्री तबलजी बरोबर पळून गेल्याच्या काही घटना ऐकल्या आहेत. अनुप जलोटा यांची पत्नी सोनाली ही सुद्धा त्यांचा तबलजी रूपकुमार राठोड बरोबर पळून गेली होती. याचा अर्थ समाजात अशा घटना घडत असतात फक्त त्या आपल्या आजूबाजूला नसल्याने जाणवत नाहीत.
पण अशी एक घटना मी घडत असताना पहिली. रोज सकाळी ब्रेकफास्ट ला , जेवायला एक मुलगी एका माणसाबरोबर सतत दिसायची. अर्थात यात विशेष जाणवण्यासारखे काही नव्हते. कामानिमित्त सहकार्यांबरोबर चहा जेवण एकत्र होत असते. ही विवाहित होती व तिला एक मुलगी पण होती. तो पण विवाहित होता. आणि अचानक दोघ कामावर येण्याची बंद झाली. काही पत्ता लागेना. काही दिवसांनी कंपनीने दोघे absconded म्हणून घोषित केले व त्यांच्या नोकर्या गेल्या. नंतर असे समजले की ती दोघ पळून गेली

आता प्रश्न असा की दोघांना सोबत राहायचे होते व ते करण्याचे धाडस होते तर हा पळपुटेपणा कशासाठी ? ते पण सुस्थितीमधील नोकर्यांची पर्वा न करता? म्हणजे आपल्या कुटुंबियांची व समाजाची भीती वाटली का त्यांना तोंड द्यायची हिम्मत झाली नाही? अशी बरीच प्रश्न चिन्हे आहेत. सगळ्या गोष्टी नीट उलगडत नाहीत. म्हणजे जे पिसे लागणे म्हणतात ते असे असते का की आयुष्य उधळून द्यावे? आशा आहे की कुठेतरी त्यांनी नवीन जीवनाला सुरुवात केली असेल कारण वर उल्लेख केलेल्या दोन्ही नायिका निराशेच्या गर्तेत जातात. सुमी आत्महत्या करते तर सावू केटी ने सांगितलेला दुसर्या शेठ बरोबर राहण्याचा पर्याय स्वीकारते पण पहिल्या नवर्याकडे जायचे धाडस नाही करू शकत.

मानवी मानत खोलवर काय चालू असेल हे सांगणे खरच अवघड आहे.

अनिल जोशी 
२३.०२.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती