ऐशी रसिक व्यक्तिमत्वे

शेवटचा दिस गोड व्हावा हा अभंग काल  माझ्या मनात सारखा पिंगा घालत होता आणि त्यामुळे बहुतेक जीवनाच भयाण रूप दिसत होत . पण जरी क्षणभंगुर असलं तरी जीवन सुंदर आहे आणि आपल्या जगण्यातून असे जीवन जगण्याचा वस्तुपाठ घालून दिला अशा काही व्यक्तींची  आठवण झाली. इंदूरचे रामुभैय्या दाते ज्यांना मी पाहिलेले नाही पण त्यांच्या बद्दल ज्या गोष्टी ऐकल्या आहेत त्या अक्षरश: आख्यायिका वाटाव्यात अशा आहेत. हे सरकारी अधिकारी असून सुद्धा आपल्या रसिकतेसाठी प्रसिद्ध होते. आणि रसिकता पण अगदी खानदानी होती. कलाकारासाठी खर्च करताना त्यांचा हात सढळ असायचा. अनेक मोठमोठ्या कलाकारांचा त्यांच्या घरी राबता असायचा. पु ल त्यांच्या व्यक्तिमत्वावर बेहद्द खुश असायचे त्यांनी गणगोत मध्ये त्यांच्यावर लेख लिहिलाच पण त्यांची व्यक्तिरेखा आपल्या तुज आहे तुजपाशी मध्ये रंगवून त्यांचे अभिजात रसिक व्यक्तिमत्व अजरामर केले. त्यांच्या बाबत एक किस्सा ऐकण्यात आला. एकदा कोलकत्ता मुक्कामी असताना ते गजल सम्राज्ञी बेगम अख्तर यांच्याकडे गेले. त्यावेळी त्या बनारस का कुठेतरी प्रवासाला जाण्याच्या गडबडीत होत्या. त्यांना वेळ नव्हता पण रामुभैय्याना त्यांचे गाणे ऐकायचेच होते. त्या म्हणाल्या "मै पेशेवार गायिका हुं" तेव्हा आपल्या हातातील एक रेशमी बटवा त्यांनी पेश केला. त्यात त्या काळी ५००० रुपये होते . रामुभैय्या म्हणाले आज इतनेही लाया हुं ,बाकी अगली बार . त्यांनी ती बिदागी स्वीकारली आणि साजिंद्याना बोलावले. वाद्यमेळ जुळला. काही क्षण त्यंनी डोळे मिटले आणि सा लावला. तो सा जसा रिषभा कडे अलगद जाऊ लगला ती नजाकत ऐकून रामुभैय्या म्हणाले --"बस बेगम साहिबा. दिलको तसल्ली मिल गायी." अक्षरश: कलाकार आणि रसिक यांच्यातील द्वैत संपण्याचा तो क्षण होता. बेगम साहिबा म्हणाल्या -"ऐसा जानकार सुननेवाला कभी नाही देखा. आज आप हमारे भगवान हो के पधारे हो. आपकी खिदमत करनेका मौका दिजीये." धन्य ते रसिक आणि धन्य ते कलाकार.
असंच व्यक्तिमत्व म्हणजे आद्य मराठी सहाय्य यवतमाळचे वा वा उर्फ भाऊसाहेब पाटणकर.व्यवसायाने वकील पण तत्वज्ञान.दार्शानिकता याचा गाढा अभ्यास. शिकारीसारखा षौक. असं रसिल व्यक्तिमत्व. पण डोळ्यातील काच बिन्दुमुळे या सगळ्यावर बंधने आली आणि त्यांनी मराठी शायरी निर्मिली. त्यांनी सांगितले कि उर्दू शायरी आणि मराठी शायरी यात एक मोठा फरक आहे. तो म्हणजे उर्दू शायरी मधला प्रियकर प्रियेची आर्जवे करेल , वारंवार अपमान सहन करून पुन्हा अपमान करू घ्यायला तिच्या मैफलीत जाईल . आणि तरीही ती वश झाली नाही तर तिला म्हणेल माझ्या जीवनात नाही आलीस तरी माझ्या प्रेतयात्रेत तरी सामील होवून दुवा कर. भाऊसाहेब म्हणतात मराठी प्रियकर इतका लाचार नाही होणार. एका ठराविक मर्यादेपर्यंत तो आर्जवे करेल व तरीही ती बधली नाही तर म्हणेल तू नाही तर दुसरी कुणी. निष्काम कर्म योगाबद्दल ते म्हणतात. आमचे हृदय म्हणजे काय किर्लोस्करांचा पंप आहे का? परमेश्वराला म्हणतात इथे आम्ही काय केले? अरे जाता जाता तुझ्या या दुनियेला शायरी देवून गेलो आम्ही. त्यांच्या नावाच्या अद्याक्षारातच वा वा असल्याने ते श्रोत्यांना सांगत दाद ओठांपर्यंत मी आणेन फक्त ती बाहेर न काढण्याचा कंजूष पणा तुम्ही करू नका. त्यांना आपल्या शाय्रीबद्दल यथार्थ अभिमान व आत्मविश्वास होता. ते म्हणत- शायरी ऐकून माझी म्हणेल जो आता पुरे, तो रतीच्या चुंबनाही म्हणेल आता पुरे..असे हे भाऊसाहेब. त्यांच्या शायरीचे कार्यक्रम ऐकण्याचे भाग्य लाभले  इतकेच नव्हे तर मित्र दिवाकर बुरसे यांच्यामुळे त्यांच्याशी परिचय पण झाला. लक्ष्मी क्रीडा मंदिरातील सुरेश भट यांचा रंग माझा वेगळा हा कार्यक्रम त्यांच्या शेजारी बसून ऐकला. त्या कार्यक्रमाला ग वा बेहेरे व सी रामचंद्र पण उपस्थित होते.
केशवराव केळकर हे तसे संघप्रचारक पण रसिक व्यक्ती. त्यांचे संघात बौद्धिक ऐकायचा योग आला . त्यांनी आपल्या बौद्धिकात अब्दुल करीम  खान साहेबांचा उल्लेख केला तेव्हाच लक्षात आल हे पाणी वेगळंच आहे. पुढे योगायोगाने ते माझे शेजारी झाले. जीवनाच्या अखेरपर्यंत ते वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यात कार्यरत होते. पण अधून मधून पुण्यात येवून राहायचे. गप्पा होत असत. एकनाथजी रानडे यांच्या भाषणावरच्या एका पुस्तकावर बोलताना ते म्हणाले -एक गुरुजी ऐकले (गोळवलकर) मग पुढे काही नाही म्हणजे भीमसेनच गाणं जसं संगीतात तसं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मुंबईत हॉस्पिटल मध्ये ठेवले होते. नंतर काही दिवसांनी पुण्यात दीनदयाळ रुग्णालयात आणले. त्यांना कुणीतरी विचारले की मुंबईत तुमची छान सोय असताना पुण्यात कशाला आलात? त्याव्वर ते म्हणाले -मरायला . आणि अक्षरश: त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे शव अंत्यदर्शना साठी मोतीबागेत ठेवले व अनेक स्वयंसेवकांच्या उपस्थितीत ते पंचत्वात विलीन झाले. हॉस्पिटलमधून पहाटे त्यांना मोतीबागेत आणले तेव्हा आम्ही चार पाच जण होतो आणि दुपारी १२च्या सुमारास वैकुंठ मध्ये त्यांना नेले तेव्हा ४०० च्या वर लोक होते. ते म्हणाले होते कि १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्याने प्रभावित होवून कर्नाटकातील हरिहर मधून मी मुंबईत आलो तेव्हा पूर्ण खादीधारी होतो. पण पुढे ते अपूर्ण आहे असे जाणवले. समग्र भरत आणि आपला समाज याचा संघाने केलेला विचार भावला आणि मी संघात आलो.
अशी रसिक व्यक्तिमत्वे आपल्या बरोबर इतरांचे जीवन पण समृद्ध करून जातात. रसिकतेची माझी  एक व्याख्या आहे. जो कुणी आपल्या व्यथा वेदना यांचे अवडंबर न माजवता लोकांशी गप्पाष्टक जमवतो व लोकांना आनंद देतो तो खरा रसिक. त्यांचे अस्तित्व जीवनाच्या चार अंगुळे वर असतं

अनिल जोशी 
०७.०२.२०२०
(कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी)

Comments

  1. अगदी खरं आहे.दाद ही ह्रदयातून आली पाहिजे त्यासाठी नेमकं हे रूप वेळीच दाद देण्याची सवय लावली पाहिजे..मग ती कोणतीही कला असो. ..अगदी पाककला सुद्धा...

    नेहमी प्रमाणे सहज सुंदर लिहिले आहेत ...आपले सगळे लेख वाचले ..लेखनातील परिपक्वता आता जास्त जाणवत आहे...खूप छान असेच लिहित रहा...

    धनश्री जोशी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती