घरातल्या घरात
आज मला घरून काम करायला लागून दोन आठवडे उलटले. बाकी लोकांना एक आठवडा झाला असेल. गेल्या रविवारी स्वेच्छेने संचारबंदी आपण अनुभवली व आता लॉक आउट च्या निमित्ताने घरात राहणे आले आहे. हळू हळू सगळ्यांनी हसत खेळत किंवा कुरकुरत हे वास्तव स्वीकारले आहे. घरून काम म्हणजे ऑफिस ला जाणे नाही. तो प्रवासाचा वेळ, वाह्तुकीमधील खोळंबा यातून सुटका. सकाळी उशीरा उठणे असे काही फायदे. पण हे ज्या कारणासाठी होते ते म्हणजे जनसंपर्क टाळणे , उगाच इकडून तिकडे जाणे यावर प्रतिबंध म्हणून. त्या दृष्टीने ज्यांना घरून काम करायला मिळाले ते नशीबवान कारण त्यांना एक सुरक्षिततेचे एक कवच मिळाले. पण ज्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून बाहेर कामाला जावे लागते त्यांचे कष्ट वाढले व स्वत:च्या आरोग्याबाबत धोका वाढला. आरोग्य सेवा देणारा कर्मचारीवर्ग तर कामाच्या ठिकाणीच मुक्कामाला आहे. पोलीस व अन्य शासकीय यंत्रणांना या धोक्या सोबतच लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. ज्यांचा रोजगार बंद झाला आहे त्यांचे अधिक हाल आहेत.
हे लगेच दिसणारे परिणाम आहेत तर पुढील आर्थिक वर्षात कदाचित अधिक तीव्र मंदीला तोंड द्यावे लागेल अशी सार्थ भीती व्यक्त करण्यात येत आहे. कारण युरोप, अमेरिका, अशा कोरोना बाधित देशांतून आपल्याकडील ऑर्डर कमी व्हायची शक्यता व तिकडून झालेल्या कामाचे पैसे पण वेळेवर न येण्याची शक्यता दिसते आहे.
यात सगळ्यात गंभीर संकट घराघरातून दिसते आहे की घर काम करणाऱ्या मोलकरणी येत नसल्याने घरोघरी जय स्वावलंबन सक्तीने सुरु आहे. या निमित्ताने त्यांच्यावरचे अवलंबित्व अधोरेखित होत आहे. घरून काम करताना आम्ही जे सहकारी तिकडे काम करायचो ते तंत्रज्ञाना मुळे एकमेकांना दिसू व बोलू शकतो. एरवी घर सोडून ऑफिसात भेटणारे आपापल्या घरातून बोलून सामायिक प्रश्नांवर चर्चा करू शकतो.
मला व्यक्तिश: घरात थांबायला आवडते (घर कोंबडा). पण ज्यांना सारखे फिरायला हवे आते, भटकंती ज्यांचा श्वास आहे त्यांना हे अवघड जात असणार.
मोलकरणी वरून मला आठवले मी एका छोट्या कारखान्यात कम करत असताना तेथील वेल्डर लोकांनी अचानक संप केला. त्यांना कुणीतरी भडकावले होते. हा संप काही दिवस चालू होता. नंतर त्याच्या बहुतेक मागण्या मान्य करून तो मिटला. तेव्हा तेथील व्यवस्थापकांनी मला सांगितले की त्यांच्याकडे हुन्नर (skill ) आहे त्यामुळे ते दुसरीकडे नोकरी मिळवू शकतात. पण आपले त्यांच्यावाचून अडते व ते मान्य करण्यात शहाणपण असते.
एकूण आपण आता घरातल्या घरात आता रुळू लागलो आहोत. घरकाम पण करू लागलो आहोत. पण हे सगळे थांबून पुन्हा सगळे पाहिल्यासारखे व्हावे असे सगळ्यांनाच वाटत असेल. मला पण सकाळी लवकर ऑफिस ला जाणे व येताना वाहतुकीत खोळंबा झाल्याने कितीही उशीर झाला तरी तेच आवडेल .
वाहने व माणसांनी तुडुंब वाहणारे रस्ते हा या शहराचा प्राण आहे. आताचे निर्मनुष्य रस्ते हे सुतकी रस्ते वाटतात व ते पहिले की आपला ओढून ताणून आणलेला उत्साह पण गळून पडतो.
ते पहिले दिवस लवकरच येवोत.
अनिल जोशी
२९.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
Chanch
ReplyDeleteछानच लिहिले आहे. खरच केव्हा एकदा रुटीन सुरू होते असे झाले आह्.
ReplyDelete