राम कथेचे गारुड
काल राम नवमी होती. राम ही भारतीयांची आस्था आहे त्यामुळे वर्षानुवर्षे हा रामजन्म सोहळा संपूर्ण भारत वर्षात साजरा होतोय. काल मात्र सगळीकडे शुकशुकाट होता . अनेक देवळात अगदी गुपचूप दोन चार लोकांनी हा सोहळा उरकला. पण परिस्थिती विलक्षण आहे त्यामुळे असा पण सोहळा पाहायला मिळाला. सगळ्या मंदिरांमध्ये कीर्तने , पाळणे, अशा उत्साहात होणारा हा उत्सव आपल्याला पहायची सवय. दुसर्या दिवशी या सोहळ्यांची रसभरीत वर्णने वर्तमान पत्रात वाचायची आपल्याला सवय पण आहे.
हे जरी असले तरी या प्राप्त स्थितीत एक दिलासा म्हणजे दूरदर्शन वर पुन्हा रामायण ही लोकप्रिय मालिका दाखवायला सुरुवात झाली आहे. रामकथा छोट्या पडद्यावर यावी अशी अनेकांची इच्छा होती आणि तिला जेव्हा मूर्त स्वरूप येत होते तेव्हा हिंदी सिने सृष्टीतील ख्यातनाम निर्माते व दिग्दर्शक रामानंद सागर यांनी हे आव्हान स्वीकारले आणि मग या मालिकेने इतिहास घडवला. ही मालिका दर रविवारी सकाळी प्रसारित होत असे आणि त्यासाठी घरातील सगळे एकत्र बसून आनंद घेत असत. आणि त्यावेळी रस्ते अक्षरश: ओस पडत असत.
या मालिकेतील उत्कृष्ट निर्मिती मुल्ये, अनेक पुराणे , वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण अशा उपलब्ध ग्रंथांचा आधार घेवून लिहिलेली संहिता, तत्कालीन वेशभूषा, कलाकारांची निवड, नयन मनोहारी बाह्य चित्रण , कुशल दिग्दर्शन या मुळे ही मालिका खूप बहित्ली जात असे. त्यावेळी आमची साप्ताहिक सुटी ही गुरुवारी असायची त्या मुळे रविवारी ऑफिस असायचे. म्हणून मालिका पहिली गेली नाही. पण कधी रविवारी सुटी आली किंवा रजा असेल तर ती पाहत असे. पण पाहत नसलो तरी मालिका गाजत होती हे जाणवत असे. या मालिकेचे मला वाटत १०० किंवा असे काही भाग झाले तेव्हा अनेक नियत कालीकांनी विशेषांक काढले. त्यातील एका अंकात बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांची मुलाखत होती त्यात ते म्हणाले होते भारतीय समाज मनावर रामकथेचे विलक्षण गारुड आहे. कारण ते त्यांनी गीत रामायणाच्या वेळी अनुभवले होते.
त्या मुळे यंदा जरी रामजन्माचा सुंठवडा नाही मिळाला तरी तेव्हा न पाहता आलेली रामायण ही मालिका पहायला मिळते आहे हे ही नसे थोडके.
अनिल जोशी
०३.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी
Nostalgic! Temvhacha Ramayan ani Mahabharat baghyala amhi thambalele asaycho. Jyanni ya Katha vachlya navhtya tyanna tv mule samjlya!
ReplyDeleteSwati Karve