वाळूचे किल्ले
अगदी समुद्र किनारी बसावे. त्या अथांग रुपात स्वत:ला विरघळू द्यावे.अगदी काठावर नाही पण थोडे दूर जिथे ओली व सुकी दोन्ही परकारची वाळू असेल तिथे वाळूचा किल्ला करायला घ्यावा . छान किल्ला करावा. त्याला तट करावा. वर जायला वळणाची वाट करावी . एक छान भुयार करावे. त्या ओल्या सुक्या वाळूमुळे हे सगळे सहज जमते. आणि आपल्या निर्मिती कडे पाहत हरवून जावे.
पण हा आनंद क्षणिक असतो. एखादी जोरात लाट येते आणि आपण केलेला किल्ला उध्वस्त होवून जातो. किंवा एखाद्या काठीने आपल्याच पावलाच्या खुणे भोवती आपले नाव लिहावे पण त्याची ही अवस्था किल्ल्या सारखीच होते.
नाटक कार कै बाळ कोल्हटकर यांनी देव दीनाघरी धावला हे नाटक लिहिले . त्यातील एक गाणे अतिशय प्रसिद्ध आहे ते म्हणजे - ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी . हे कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेले गाणे सुरेल आणि अर्थवाही पण आहे.
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी
त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी
कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मिच्या गाठी
कधि जवळ् सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी
आयुष्याच्या संध्याकाळी हिशेब मांडताना झालेली अवस्था किती तरल आहे. आणि यात असे ही म्हटले आहे की आयुष्यातील ज्या काही आठवणी आहेत त्या वाळूत मारलेल्या रेघा आहेत.
समुद्राची अथांगता, धीर गंभीरता यात सुद्धा जीवनाची क्षण भांगुरता च जाणवते. समुद्राचा अव्याहत पाने चालू असलेला लाटांचा खेळ आणि धीर गंभीर गर्जना म्हणजे मूर्तिमंत जीवनाचे प्रतीक आहे . असे असताना मग जीवनाच्या क्षण भंगुरतेची जाणीव इथेच होणे क्रमप्राप्त आहे.
जीवन हे वाळूच्या किल्ल्यासारखे सुंदर आहे आणि क्षण भंगुर ही हेच त्यातील वास्तव आहे.
अनिल जोशी
०६.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
सही..
ReplyDeleteधनश्री जोशी