नाविन्याचा शोध

नवीन गोष्टींचे प्रत्येकालाच अप्रूप असते. कारण जे आहे ते माहित झालेले असते त्यातील कुतूहल संपलेले असते मग साहजिकच नवीन काहे मिळाले तर हवेच असते. पण यात नाविन्य हे किती आहे , किती टिकणारे आहे हे पण महत्वाचे असते. एखाद्या लहान मुलाला जर नवीन खेळणे दिले तर तो त्याच्याशी थोडा वेळ खेळेल , कदाचित कुतूहलापोटी ते मोडून टाकेल मग त्यातील नाविन्य हे खूपच क्षणभंगुर ठरते. नवीन आणलेल्या कपड्यांचे नाविन्य पण ते एकदा घालेपर्यंत टिकते. तर काही नवीन गोष्टी ह्या रुळून जातात व त्यातील नाविन्य संपते. एखादा कलाकार गायक एखाद्या नवीन रागाची निर्मिती करतो आणि तो जर आवडला तर रसिक त्याचे स्वागत करतात, इतर कलाकार तो राग आत्मसात करून सादर करतात आणि मग तो राग नवीन राहत नाही.
अर्थात नाविन्य किती काळ टिकणार हे त्या त्या गोष्टीवर अवलंबून असते. एका कार्यक्रमात नृत्य करता करता पंडित बिरजुम्हाराज म्हणाले आत्ता काही मुद्रा , जागा सुचतात व त्या पेश केल्या जातात पण त्या तिथेच राहून जातात. एखादे गाणे सादर करताना कलाकार अनेक नवीन जागा घेतो पण ती त्या त्या वेळेची निर्मिती असते. एखादी निर्मिती उत्कृष्टतेकडे नेण्यासाठी त्यात अनेक नवीन कल्पना, साधने वापरली जातात आणि या नाविन्यामुळे निर्मितीचा आनंद द्विगुणीत होतो. किंबहुना निर्मिती म्हणजेच नाविन्य असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
दिवाळी अंकाची पाने लावताना त्यातील चित्रे चित्रकार चंद्रमोहन तिथल्या तिथे काढत असे व त्याची ही निर्मिती शेजारी बसून पाहण्याचा योग अनेक वेळा आला आहे. असे चित्र झाल्यावर तो त्याच्याकडे तटस्थतेने पाहत असे. तेव्हा ताच्या नजरेत एक कुतूहल, किंवा यात आणखी काय करता येईल हा भाव असे आणि याला सुचले की तो लगेच त्यात बदल करत असे. आणि मग त्याच्या चेहेर्यावरील तो निर्मितीचा आनंद विलक्षण असे.
हल्ली मैफलीत ऐकून ऐकून समजायला लागले आहे की कलाकार जे सदर करत आहे ते नाविन्याच्या मिन्वा वेगळेपणाच्या ध्यासातून सादर  करत आहे की जे तयार आहे तेच सादर करत आहे. अर्थात श्रोत्यांना पण फारसे नवीन नको असते. नवीन ऐकू इच्छिणारे श्रोते कमीच असतात. जेव्हा पंडित जितेंद्र अभिषेकी प्रसिद्धीस आले तेव्हा त्यांच्या मैफली खूप रंगत असत. पण अभिषेकी हे सच्चे कालालर होते. त्यांचा नाविन्याचा , उत्कृष्टतेचा ध्यास कायम होता. प्रयोगशीलता कायम होती. मग एका रसिकाने त्यावर भाष्य केले की आता पंडितजींचे गाणे बुद्धिवादी व्हायला लागले. ते अनवट होऊ लागले. त्यांचा हाच गुण त्यांचे चिरंजीव शौनक यांनी उचलला व महत्वाच्या मैफलींमध्ये ते आवर्जून नवीन (अनवट) गाणे पेश करू लागले.
साहित्यात ही अनेक जुन्या गोष्टी कालबाह्य झाल्या उदा. पल्लेदार लांब लचक वाक्ये, अलंकारांचा वारेमाप वापर इत्यादी. व त्यांची जागा छोट्या सुटसुटीत वाक्यांनी घेतली. हे भाषेच्या वापरातील नाविन्य होते. मोठे निबंध लघु झाले. साहित्यातील हाताळले जाणारे विषय बदलले ते पण एक प्रकारे नाविन्य होते. हे सगळे बदल बर्यापैकी रुळले म्हणजे ते मूळ प्रवाह झाले. पण काही बदल पचनी पडले नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे किरण नगरकर यांची सात सकं त्रेचाळीस ही कादंबरी . ही कादंबरी टप्प्याटप्प्याने न जाता एकदम चार पाच टप्पे ओलांडून पुढे जाते. मधले टप्पे वाचकांच्या कल्पना शक्तीवर सोडले असावेत. हा प्रयोग पूर्ण फसला कारण नंतर नगरकर पण त्याच्या वाटेला गेलेले दिसत नाहीत. पण कवींनी मात्र नव्या मनुची अनेक गाणी लिहिली. अनेक कवींनी लोकांना क्रांतीला उद्युक्त करणारी काव्ये लिहिली . यात त्यांना एक वेगळे विश्व दिसत होते.
प्राप्त काळ हा विशाल भूधर , सुंदर लेणे त्यावर खोदा
असा संदेश पण दिले. अशा कवींमध्ये पटकन आठवणारी नावे म्हणजे केशवसुत, बा सी मर्ढेकर.
सध्या भाषेत सांगायचे तर चौकटी बाहेर विचार करणे म्हणजे नाविन्य. त्यासाठी कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता विचार करणे महत्वाचे.कारण काही नाविन्य क्षणभंगुर असते, काही रुळून जुने होते. पण म्हणून नाविन्याचा शोध थांबत नाही. कधी जुन्या आठवणी , प्रसंग , घटना पुन्हा मांडणे ही पण निर्मिती असते. त्यात नाविन्य नसले तरी त्या पण कलाकृतीच असतात.
तसा उजाडणारा दिवस हा नवीनच असतो . पण आपले मन ठरवते की हा दिवस नाविन आहे की नाही ते. त्यामुळे नाविन्याचा शोध हा आपल्या मनावर असतो. त्यामुळे नाविन्याचा शोध आणि ध्यास घेणे हे जिवंत पणाचे लक्षण असते.

अनिल जोशी
०१.०८.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments

  1. ब्लॉग प्रथमच वाचला. छानच आहे आवडला. - सुषमा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती